( मोडी लिपी )
कोणतीही लिपी ही त्या भाषेचा आत्मा असते तसेच मोडी लिपीचेही आहे,मोडी लिपी ही मराठी भाषेचा आत्मा आहे.मोडी भारतात १२ व्या शतकापासुन अस्तित्वात आहे.इंग्रज राजवटीच्या आधी मोडी लिपी ही व्यवहाराचा अविभाज्य भाग होती पण नंतर तिच्या अस्तित्वाचा वाद निर्माण झाला,तसेच सुशिक्षितांनाही मोडीत लिखाण करण्याऐवजी इंग्रजीत व्यवहार ठेवणे प्रतिष्ठेचे वाटू लागले त्यामुळे कालांतराने मोडी लिपीचा वापर बंद झाला.
मोडी लिपीचा इतिहास -
मोडी लिपी ही १३ व्या शतकापासुन २० व्या शतकाच्या मध्यापर्यंत मराठी भाषेची प्रमुख लेखन पद्धती होती."महादेव यादव" आणि "रामदेव यादव" यांच्या राज्यकालात १२६०-१३०९ मध्ये "हेमाद्री पंडित (हेमाडपंत)" नावाच्या प्रधानाने मोडी लिपीचा विकास केला असे परंपरेने मानले जाते परंतु ही लिपी राजा अशोकाच्या काळातही अस्तित्वात असल्याचे नवीन संशोधनातुन समोर आले आहे.
मोडी लिपीच्या उगमाबद्दल अनेक मते आणि मतभेद आहेत.इतिहासाचार्य वि.का.रानडे व डॉ.भांडारकरांच्या मते हेमाडपंताने ही लिपी श्रीलंकेतून आणली, परंतु चांदोरकरांच्या मते ही लिपी अशोककाळातील मौर्यी (ब्राह्मी) चाच एक प्रगत प्रकार आहे,पण मोडी लिपी ही श्रीलंकेतून आणली गेली असावी अथवा मौर्यी लिपीवरून विकसित झाली असावी हे म्हणणे वाकणकर आणि वालावलकर यांना मान्य नाही.तसेच मोडी हा शब्द फारसी भाषेतील "शिकस्ता" यावरून तयार झाला आहे असे म्हंटले जात होते पण अलिकडे, कर्नाटकात ९व्या शतकातील काही आढळलेले शिलालेख हे मोडी लिपीत असून मोडी लिपी ही शिकस्ता मधून निर्माण झाली या मताचे खंडण करते. १०व्या शतकात "नस्तलीक" मधून "शिकस्ते" लिपी जन्मास आली. "शिकस्ता" म्हणजे "मोडकी नस्तलीक". यावरून स्पष्ट होते की मोडी लिपीची संकल्पना ही शिकस्ता मधून आली नव्हती. तसेच, महादेवराव, रामदेवराव किंवा हरपालदेवराव यादवांच्या कारकिर्दीत श्रीलंकेशी संपर्क आला नव्हता.
मोडी लिपी महाराष्ट्रात कमीत कमी ९०० वर्षे वापरात होती. सर्वांत जुना उपलब्ध मोडी लेख इ.स. ११८९ मधील आहे. ते पत्र पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाच्या संग्रहात आहे.मोडी लिपी ही मराठीची जुनी लिपी आहे पण मोडी लिपी प्रचारात येण्याच्या आधी आपल्या इथे नागरी लिपी वापरली जात होती.आपले सर्व जुने शिलालेख,अगदी शिवकालीन लेखही नागरी लिपीतच आहेत.मोडी लिपी ही नागरीचीच 'रंनिंग' लिपी आहे. त्यामुळे नागरी/देवनागरी आणि मोडी यात फारसा फरक नाही. पण मोडी अनेक वर्षे सतत वापरात असल्याने तिचे स्वरूप जास्त बदलत गेले. म्हणजे शिवकालीन मोडी आणि उत्तर पेशवेकालीन मोडी यातही फरक आहे.
सुरवातीच्या काळात मराठी-मोडी लिहिण्यासाठी ज्या शाईचा वापर होत असे ती शाई चिंचेच्या बियांपासून काढलेले बलक व कोळशाच्या किंवा लाखेच्या भुकटीच्या मिश्रणापासून बनवली जात असे. ह्या शाईचे लिखाण पुसले जाणे अतिशय कठिण तसेच लेखणी साठी बोरूचा वापर होत असे.
मोडी लिपीचा पहिला लिथोग्राफ, सेरामपुर बंगाल येथे इ.स.१८०१ मध्ये विल्यम कॅरे याने पंडित वैजनाथ यांच्या मदतीने बनवला व १८०७ मध्ये 'रघु भोसल्यांची वंशावळी', 'मराठी भाषा व्याकरण','मराठी कोश' या ग्रंथांची मोडी लिपीत छपाई केली गेली.
मोडी लिपीतील बदल -
मोडी लिपी १९५० पर्यंत लिखाणात वापरली जात होती पण गेल्या २-३ शतकात मोडी लिपीत अनेक फेरबदल झालेले आहेत. साधारण इ.स. १७००च्या सुमारास चिटणिसी आणि वळणे ही पूर्णपणे प्रगत झाली व यानंतर त्यात फारसे बदल दिसून येत नाहीत. ऐतिहासिक कागदपत्रातील मोडी लिपी क्लिष्ट आणि वाचण्यास कठीण असते.मोडी लिपी पेशव्यांच्या काळात अत्यंत उत्कर्षावस्थेत होती असे मानले जाते. पेशवे यांच्या दप्तरातील कागदपत्रे, दस्तऐवज पाहिले असता त्या उत्कर्षाची कल्पना येते. सुबक अक्षर, दोन ओळीतील समान अंतर, अत्यंत शुध्दलेखन हे या लेखनाचे वैशिष्ट्य. शिवकाळ ते उत्तर पेशवाई ह्या काळातील मोडीवाचनातून मराठी भाषेतील स्थित्यंतरे, बदल लक्षात येतात. मराठी भाषेचा प्रवास अभ्यासता येतो.
मोडी लिपीचे कालखंड -
मोडी लिपीचे वर्गीकरण हे चार कालखंडात केले गेले आहे.– यादवकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन आणि आंग्लकालीन. यादवकालीन मोडी लिपी लिखानात अक्षरे एकमेकांच्या अगदीच जवळ आणि उभी काढली गेली. तिच, शिवकालीन शैलीत किंचीत उजवीकडे वाकलेली दिसतात. मोडी लिपीला तिरकस वळण, अधीक वर्तुळाकार आणि सुटसूटीत अक्षरे लिहीण्याचा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराजांचे चिटणीस बाळाजी आवजी यांजकडून सुरु झाला. इथ पर्यंत मोडी लिपी ही टाक ने लिहीली जात. याच प्रयत्नांना पुढे चालू ठेवून पेशवेकालीन शैलीत ती अगदीच सुंदर, रेखीव, गोलाकार, तिरकस आणि सुटसूटीत लिहीली गेली. पेशवेकाळात लिखाण बोरूने होत असे. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रज राजवटीत फाऊंटन पेनाचा वापर सुरू झाला. बोरूने जी प्रत्येक अक्षराला जाडी-रूंदी आणि टोक येत ती या फाऊंटन पेनाच्या वापरात शक्य नसल्याने मोडी लिपी अगदीच गुंतागूंतीची, किचकट आणि कुरूप दिसू लागली. फाऊंटन पेनाचा एकच फायदा होता तो म्हणजे त्यात शाई बराच वेळ टिकून रहात. म्हणून सध्याचे मोडी लेखक फाऊंटन पेनाच्या कॅलीग्राफीच्या निब्सचा वापर करतात आणि काही प्रमाणात पेशवेकालीन मोडी लिपीचे सौंदर्य आणण्याचा प्रयत्न करतात.
मोडी लिपीची वैशिष्ठे -
• देवनागरीपेक्षा मोडी लिपीत जलद गतीने लिहिता येते.
• मोडी लिपीत केवळ एकाच 'ई' काराचा व 'ऊ' कराचा वापर होतो त्यामुळे ऱ्हस्व-दीर्घ च्या चुका कमी होण्यात मदत होते. मोडी लिपीत दोन अक्षर एकमेकांना जोडून लिहिण्याच्या विशिष्ट
पद्धतीमुळे, लेखणी वारंवार उचलण्याचा प्रसंग कमी येतो व त्यामुळे लिखाणाची गती वाढण्यास मदत होते.
• मोडीतील जोडाक्षरे ही संस्कृत भाषेचे नियम पाळतात.
• मोडीतील जास्तीत जास्त अक्षरे ही 'नागरी' आहेत. 'काने' चा उपयोग वरच्या बाजूला तसेच पुढील अक्षराला जोडण्यासाठी केला जातो.
• 'ई', 'ज', 'झ', 'त्र', 'ट', 'द', 'ध' ही मोडी अक्षरे 'नागरी' तील घसाटी पद्धतीने लिहिली जातात. उ. दा. गुजराती व महाजनी.
• अनुस्वाराच्या बाबतीत मोडीचे स्वतंत्र नियम आहेत.
• डोक्यावरील आडवी रेषा वाक्याचे लिखाण सुरू करण्यापूर्वी आखून घेतात जेणेकरून लिहिताना सारखा हात उचलावा लागू नये, ज्या गोष्टीची गरज नागरी लिहिताना भासते.
• थोडक्यात मोडी ही घसाटी पद्धतीने लिहिलेली नागरी होय.
• अतिशय मोजक्या ठिकाणीच लेखणी उचलली जाते.
• मोडी अक्षराची सुरवात व शेवट वरच्या ओळीवर असतो.
• मोडी अक्षरांना कुठेही टोके नकोत. सगळी अक्षरे अतिशय वळणाकृती व गोलाकार असली पाहिजे.
• जोडाक्षर 'बाळबोध' पद्धतीने लिहिली जातात.
• 'आ'कार व 'काना' लिहिताना रेषा खालून वर अशी ओढली जाते.
• 'ई'कार लिहिताना वेलांटी पाठोपाठ 'काना' लिहिला जातो. सगळ्या मात्रा ह्या शब्दाच्या शेवटी दिल्या जातात.
मोडी लिपी शिकतांना/वाचतांना घ्यावयाची काळजी -
•मोडी लिपीमध्ये वेगवेगळ्या अश्या ४८ अक्षरांचा समावेश असतो, त्यामधे ३६ व्यंजने तर १२ स्वर असतात.
•लिखाणाची सुरवात करण्यापूर्वी, संपूर्ण पानावर आडव्या रेषा मारून मग दोन रेषांच्या मध्ये ही लिपी लिहिली जाते.
•ह्या लिपीत विराम चिह्नाचा किंवा उभयान्वयी अव्ययांचा अभाव असतो,वाक्य समाप्ती दर्शविण्यासाठी कुठल्याही चिन्हाचा वापर नसतो,तसेच देवनागरी लिपीत वापरण्यात येणाऱ्या उभ्या रेषांचा
उपयोगही नसतो.
•वाक्यातील दुरुस्ती ही फुली मारण्यापेक्षा साधारणपणे चुकीच्या अक्षराखाली किंव्हा शब्दाखाली आडवीरेष मारून दर्शविली जाते.
•काही वारंवार येणाऱ्या शब्दांसाठी त्याचे संक्षिप्त रूप करून त्याचा लिखाणामध्ये उपयोग केला जातो.
•मोडो लिपीत शब्द न तोडता सलग लिहिला जातो.संपूर्ण शब्द मावत नसेल तरी त्याची जेवढी अक्षरे त्या ओळीत लिहिणे शक्य असेल तेवढी अक्षरे अक्षरशः कोंबलेली असतात.त्यामुळे तो
शब्द वाचकास माहित असणे फार गरजेचे असते.
मोडी लिपीची हाक -
मोडी लिपीचा काळ हा ९०० वर्षांपेक्षा जास्तचा आहे म्हणजे महाराष्ट्राचा ९०० वर्षापासूनचा सगळा इतिहास मोडीत लिपीबद्ध केला गेला आहे.एवढा सम्रुद्ध इतिहास लाभलेल्या देशात तोच इतिहास अभ्यासुन लोकांपर्यंत पोचवण्यासाठी जाणकारांची कमतरता भासते आहे.आज पुण्यात 12 लाखांपेक्षा जास्त मोडी लिपीतील दस्तऐवज उपलब्ध आहेत पण त्या ऐतिहासिक कागदपत्रांच्या अभ्यासासाठी त्यामानाने अभ्यासक कमी आहेत.असे अनेक लोक महाराष्ट्रात आहेत कि ज्यांच्या जवळ जुनी मोडी लिपीतील कागदपत्रे आहेत पण मोडीच्या अज्ञानाने तो अनमोल ठेवा दुर्लक्षित केल्या जात आहे.
इतकी वर्षे आपण आपल्याला शिकवला गेलेलाच इतिहास पुढच्या पिढीला शिकवत आलो आहोत पण अजूनही अंधारात असलेला इतिहासाचा अभ्यास करून तो नवीन पिढीला शिकवण्याच्या आपल्या कर्तव्याकडे कानाडोळा करण्याच्या वृत्तीने मोडी लिपीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.आज आपण फक्त शिवरायांनी केलेल्या पराक्रमांबद्दल बोलतो,पण तो पराक्रम गाजविण्यासाठी त्यांनी कोणती आणि कशी तयारी केली,राज्यकारभार कसा सांभाळला,शिवरायांची राजनीती, युद्धनीती व न्यायनीती या विषयांचा अभ्यास व्हायला नको का?ह्या बद्दलची माहिती जगापुढे यायला नको का? इ.स.१९५६ मध्ये स्व.यशवंतराव चव्हाण यांनी मोडी जाणकारांना हे ऐतिहासीक दस्तावेज मोडी लिपीतून देवनागरी लिपीत लिप्यांतर करण्यासाठी खुले निमंत्रण दिले होते त्यावेळी त्यांना महाराष्ट्र सोडून इतर राज्यांतून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.ही मराठी म्हणवणारया साठी लाजिरवाणी गोष्ट होती पण त्याहीपेक्षा लाजिरवाणी गोष्ट म्हणजे जेव्हां त्यांना जपानच्या टोकियो युनिव्हर्सिटीच्या इतिहास विभागाकडून पत्र आले की ‘तुमच्याकडे मोडी लिपी वाचक नसतील तर आमच्याकडील कुशल लोक तुमच्या विनंतीवरून आम्ही पाठवू शकतो’.त्यावेळी मराठी जनतेला या जपानी लोकांचे फार कुतूहल वाटले पण स्वत:ची लाज वाटली नाही आणि आजही ती तशीच कायम आहे.फक्त तोंडानी "शिवाजी महाराजकी जय" म्हणुन फायद्याच नाही तर इतिहासाचा अभ्यास करून नवीन पैलु प्रकाशात आणण्यासाठी जिज्ञासु तरुण रक्ताने पुढे सरसावण्याची गरज आहे.जगातील सगळ्या गोष्टी ह्या नश्वर आहेत पण इतिहास हा तसाच टिकून राहणार आहे.आज जर आपण असेच हातावर हात ठेऊन बसून राहिलो तर ही ९०० वर्षांची कागदपत्रे नष्ट होऊन बराच अज्ञात इतिहास काळाच्या पडद्याआड नक्की जाईल व आपण संपूर्ण इतिहास समजून घेण्यापासून वंचित राहू.वाळवीच्या प्रादुर्भावामुळे वर्षाला हजारोनी पत्र जाळून टाकली जातात. म्हणजे ही आपली ऐतिहासीक अमुल्यवान संपत्ती आणि अप्रकाशित इतिहास कायमचाच नष्ट होत आहे की जो वर्तमान आणि भावी पिढीला कधीच कळणार नाही.
चीन पासून इटली पर्यंत, जपान पासून मेक्सिको पर्यंत सगळ्याच देशांना आपल्या भाषेचा आणि इतिहासाचा अभिमान आहे व तो जपण्याचा ते प्रयत्न करत असतात.२००८ च्या चीनमधील ऑलंपिकच्या उदघाटन सोहळ्यात चीनच्या पंतप्रधानांनी चीनी भाषेतच आपले भाषण केले होते.ऑलंपिकमधील उलटी मोजणी सुद्धा चीनी अंकातच होती. २ तास चाललेल्या उदघाटन सोहळ्यात त्यांनी चीनी संस्कृतीचं,इतिहासाचा प्रदर्शन केल.आज जर आपली संस्कृती,भाषा,लिपी,इतिहास जपायचा असेल तर पहिले त्याचा अभिमान बाळगणे आवश्यक आहे.परंतु आपल्याच सरकार मधील एका वरिष्ट नेत्याने (कपिल सिब्बल),शाळा आणि कॉलेजच्या अभ्यासक्रमातून देवनागरी अंकांना काढून त्यांच्या जागी इंग्रजी अंकांना प्राधान्य देण्याचा आदेश देऊन आपल्याला आपल्या भाषेबद्दल आणि इतिहास बद्दल किती कळकळ आहे हे दाखवुन दिले आहे.तेंव्हा अश्या सरकार कडुन आपण किती अपेक्षा करायची हे ज्याचे त्याने ठरवावे.
सुरज बबन थोरात
८२३७३७०७६२
Recent Comments